मी श्री आण्णाराव रुद्राप्पा पाटील ( सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक) मूळ गाव -सनमडी , ता- जत, जि-सांगली.
मी 2022 ला सेवानिवृत्त होऊन तीन वर्षे झाली. शासनाच्या नियमानुसार कंत्राटी शिक्षक म्हणून जिल्हा परिषद मॉडेल स्कूल काराजनगी या शाळेत कंत्राटी शिक्षक म्हणून काम करत होतो . दिनांक 10 एप्रिल 2025 माझ्या सौ मला म्हणाल्या की "अहो तुम्ही रिटायर होऊन तीन वर्षे झाले आणि ही शाळेतली कागदं अजून कशाला ठेवलाय? ह्यातले जितकी महत्त्वाचे आहेत तेवढे ठेवा आणि बाकीचे द्या टाकून रद्दीला."
मी चालढकल करत महिना दोन महिने घालवले होते. पण त्या पोत्यातल्या रद्दीला हात लावला नाही. पोत्यात भरलेल्या वह्या, कागद , ताव, डायऱ्या वेगवेगळ्या प्रशिक्षणाच्या वह्या हे बघून मला त्यातल्या वस्तू काही टाकून द्याव्याशा वाटत नव्हत्या. पण शेवटी कोणतं महत्त्वाचं किती महत्त्वाचं या वस्तू पाहिल्या खेरीज टाकणं हे मला योग्य वाटत नव्हतं म्हणून दिनांक 10 एप्रिल 2025 रोजी काहीतरी ह्यातलं कमी करूया आणि टाकूया असं ठरवलं. महत्त्वाचं तेवढं ठेवूया नसेल तर सगळं रद्दीला देऊ या. हा विचार मनात ठेवून मी पोत्यात भरून ठेवलेले जुन्या वह्या, पुस्तकं, डायऱ्या काढल्या. यामध्ये अनेक विविध प्रकारचे ताव, चित्र संग्रह, लेख संग्रह विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या उपक्रम वह्या, वेळोवेळीच्या नोंदी, टाचण वह्या अशा अनेक वह्या त्या पोत्यात होत्या. त्यातच एक टीचभर छोटी वही सापडली. ती वही कशाची आहे म्हणून बघितलं, तर त्यावर सोनाली वसंतराव काशीद इयत्ता आठवी न्यू इंग्लिश स्कूल निगडी. HAPPY NEW YEAR- 2007 पाटील सर यांना माझा कवितासंग्रह सप्रेम भेट असं लिहिलेले पान दिसले.
मी शाळेत विविध उपक्रम राबवायचो. त्यापैकी एक म्हणजे स्वयं कविता लेखन. विद्यार्थ्यांना एखादा कडव्याचा मुखडा द्यायचा आणि विद्यार्थ्यांनी कविता तयार करायची असा मी उपक्रम घेतला होता. सोनाली वसंतराव काशीद ही 7 वी त शिकणारी विद्यार्थिनी. त्यावेळी चपळ , चुणचुणीत आणि हुशार होती. माझा हा उपक्रम तिला फार भावला. त्यामुळे तिने वेगवेगळ्या विषयावर दहा कविता तयार केल्या. शिक्षक म्हणून काम करत असताना आपण पेरत राहणं हे एकच वाक्य मला कायम भावायचं. आपण पेरतो ते केव्हा का उगवे ना? परंतु आपण विद्यार्थ्यांना दिलेले संस्कार आणि त्यांच्यात रुजवलेले विचार हे त्यांच्या प्रतिक्रियातून आणि त्यांच्या बोलण्यातून ह्या व्यक्त होत असतात. त्या विद्यार्थिनीने दहा कविता तिच्या बाल समजुती प्रमाणे तयार केल्या. तिच्या मनातील विचार पत्र रूपाने लिहिले आणि ती मला वही HAPPY NEW YEAR 2007 म्हणून भेट दिली.
त्या वेळची ती सोनाली मला आठवली. 2007 साली 7 वी झाली. 2025 मध्ये ती 33 वर्षांची झाली असेल. तिचा मी शोध घेण्याचा प्रयत्न केला पण ती लग्न होऊन कुठे गेली असेल ? हे मला आता कसं कळणार? त्यावेळच्या अनेक विद्यार्थ्यांना विचारून तिचा फोन नंबर मिळवण्याचा प्रयत्न केला; परंतु मला मिळाला नाही.
दोन दिवसानंतर मी ती वही शाळेतील विद्यार्थ्यांना उपक्रम म्हणून दाखवण्यासाठी घेऊन गेलो. सोबत मी 10 वी त असताना 1980 साली घेतलेली डिक्शनरी आणि आई लेखमाला संग्रह पण नेला. माझ्या सहकाऱ्यांना मी सारी हकीकत सांगितली.माझं मन त्या मुलीचा शोध घेण्यासाठी धडपडू लागलं. तेव्हा माझे सहकारी भाऊसाहेब महानोर म्हणाले , सर! या पत्राला आपण प्रसिद्धी देऊ. हस्ते परस्ते हा लेख सोनाली पर्यंत पोहोचेल. आणि मग तुमचा कॉन्टॅक्ट होईल.
माझ्या आठवणीतील विद्यार्थिनी सोनाली काशीद तिच्यापर्यंत हा मेसेज पोहोचावा ही एकच अपेक्षा या लेखाच्या पाठीमागील आहे. एका प्राथमिक शिक्षकाची सर्वात मोठी ट्रेझरी किंवा त्यांचा संग्रह काय असतो ? तर त्यांनी तयार केलेले विद्यार्थी, हा त्यांचा सर्वात मोठा संग्रह असतो. त्यापैकी एक आठवणीतील विद्यार्थिनी म्हणून सोनाली वसंत काशीद असा हिचा उल्लेख मला या प्रसंगाने किंवा याद्वारे मला निश्चित करावा लागेल. आज ती कुठे असेल? ती कविता करते की नाही? तिला कविता का भावल्या? तिच्या मनातील ह्या भावना तिने व्यक्त केल्या आणि तिच्या मनातील विचार पत्ररूपाने व्यक्त केले.
सोनालीला जे वाटलं ते तिनं लिहिलेलं दिसलं.
कु. सोनाली वसंतराव काशीद
न्यू इंग्लिश स्कूल निगडी (खुर्द) ,
ता- जत, जि- सांगली.
इयत्ता - आठवी
माननीय पाटील सर यांना,
आपली विद्यार्थिनी सोनाली हिचा शि. सा. नमस्कार, विनंती विशेष .
आता पत्र लिहिण्यास कारण की बरेच दिवस तुम्ही मला भेटला नाही ; कारण तुमची बदली झाली. सर ,मला इतकं दुःख झालं ; की जशी गायीची वासराची ताटातूट होते. तशी शिक्षक व विद्यार्थिनी ताटातूट झाली ! " सर मी आठवीत गेली तरी तुम्ही निगडी शाळेवर असता , तर मला तुमचे दररोज तोंड दिसले असते. मला वाटले असते की मला ज्ञानाची ज्योत दिलेले गुरु मला दिसले म्हणून मला आनंद झाला असता.
सर तुमच्या शाळेचे टाइमिंग मला माहित नाही. उन्हाळसुट्टी लागली तेव्हा माझ्यासमोर अनेक प्रश्न उभे राहिले. आता मला असे शिक्षक मिळतील का? मला कविता करण्यास सांगतील का ? असे प्रश्न माझ्यासमोर उभे राहिले. नंतर आठवी शाळा सुरू झाली व दोन आठवड्यात मुली म्हणाल्या की पाटील सरांची बदली झाली. हे ऐकताच मला खूप दुःख झालं. माझे कशावरच मन लागेना. मला वाटले की मी आठवीत गेली तरी 26 जानेवारी, 15 ऑगस्ट वेळी भाषण केले तरी पाटील सरांचे कौतुक हे कोठ्यावधीचे आहे.
सर ! तुम्ही माझं नव्हे ; एखाद्या छोट्याशा विद्यार्थ्यांनं, एखाद काही चांगलं सांगितलं, तर तुमचे कौतुक त्या विद्यार्थ्याला , आणखी काही चांगले विचार घे." असे मार्गदर्शन करते. सर ! सातवीत असताना एक स्त्री , " माझ्या मुलाला एका मुलाने मारलं, त्या कार्ट्याने माझ्या बाळाला मारलंय." म्हणून भांडण्यास आली. तेव्हा तुम्ही म्हणाला की ,"अहो बाई, जरा विचार करून बोला. आपलं म्हणजे बाळ आणि दुसऱ्याचं कार्ट ?" ही सर्व मुलं आमचीच आहेत. तेव्हा मला तुमचा अभिमान वाटला. मी इयत्ता सातवी पर्यंत शिकत आली. परंतु सर्व मुलं माझीच आहेत असं कोणीही म्हटलं नव्हतं. सर, आम्हाला पिलाप्रमाणे शिकवण देणाऱ्या गुरूला मी कसं विसरू ? सर, तुम्ही मला विसरत आहे. पण सर , ज्ञानाची ज्योत दिलेल्या गुरूला मी कसं विसरू ? कोणतंही संकट आलं की तुम्ही दिलेल्या ज्ञानाचा वापर करते. सर, तुमच्या ज्ञानामुळेच मी अनेक कविता लिहिल्या आहेत. तुमच्याकडे गांधीजी प्रमाणे ज्ञान आहे. सर, गांधीजी प्रमाणे तुम्ही शिकवण देता. पण एकाचच वाईट वाटतं की, तुमची बदली झाली. मला वाटलं, तुमचा निरोप समारंभ करतील. परंतु केला नाही. कधीतरी तुम्ही रस्त्यावरून जाता तेव्हा मला अतिशय आनंद होतो. नंतर काही दिवसांनी तुमची बदली निगडी शाळेवर झाली. सर ! माझा आनंद या भूमीवर देखील मावेना. तुमचा उपकार माझ्यावर भरपूर आहे. मी तो कसा फेडू ? तो म्हणजे तुम्ही मला काराजनगीतून निगडीत आणलं म्हणूनच एवढं ज्ञान तुमच्याकडून मिळालं. सर ! कोणीतरी माझे आवडते शिक्षक हा निबंध सांगितले तर मी चटकन तुमचे नाव लिहिते. सर तुम्हीच म्हटला होता ना! श्रीमंत गरिबांला मान देत नाहीत. कितीही केलं तरी गुरु हा श्रीमंत आणि शिष्य हा गरीब. सर ! मी जवळजवळ नऊ - दहा कविता केल्या आहेत. सर ! मी तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा म्हणून माझा कविता संग्रह देत आहे. सर तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा! या नवीन वर्षात चांगले विद्यार्थी मिळो. त्यांच्याकडून तुम्हाला समाधान मिळो. विद्यार्थी प्रयत्नशील असो. सर ! तुमच्या शाळेलाही माझ्या शुभेच्छा. घरातील मंडळींना माझ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा. सर ! तुमचा आवाज, शिकवण्याची पद्धत मला अतिशय आवडायचे. रेडिओमधील प्रकाश गडदे व तुमचा आवाज , हसवण्याची पद्धत सेम सेम आहे , म्हणून त्यांचा मी आवाज ऐकतेय. सर पुन्हा एकदा तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा ! तुम्हाला लाख लाख शुभेच्छा!
" नवीन वर्ष नवीन नाती नवीन गीते गाऊ
नवीन वर्ष सुखाचे जाओ
नवीन वर्ष हे लाख मोलाचे
लाख लाख शुभेच्छा देण्याचे
नवसंकल्प नवप्रयत्न नवीन काहीतरी शिकू .
" माझ्या ज्ञानात घातली पाटील सरांच्या ज्ञानाची भर,
चुकीच्या शब्दाला करावी माफी सर ."
आता पुरे करते माझे तुमच्या विषयाचे मनोगत.
आपलीच विद्यार्थिनी,
सोनाली काशीद
माझ्या कविता
अनुक्रमणिका
(1) मनुष्याचा मुलगा
(2) सावत्र आई
(3) देश स्वतंत्र करण्यासाठी
(4) हे जग
(5) शेतकरी
(6) भोळा शेतकरी
(7) शेतकऱ्याचं कोडं
(8) कशाला काय म्हणू नही
(9) शासनाने आता शाळेकडे दुर्लक्ष केलं
(10) प्रयत्न सोडू नको
==================================
◆ कविता क्र.(1) मनुष्याचा मुलगा ◆
अरे मनुष्याच्या मुला
माजू नको रे अन्नाला
उधळू नको रे पैसा अडका
आई बापाने केला तुला लाडका
आई म्हणते मोठा हो बाळ
बाळाच्या मागे लागला दारूचा काळ
दारूच्या नादी शाळा तू सोडली
आई बापांचे वचन तू मोडले
मोठा झाल्यावर आई बापांना विसरला
आई बापाने किती केले रे तुला
विसरलास का तू त्यांना
कोणीही नाही वाली त्यांना
मोठा झाल्यावर आली राणी
आईबापांना देत नाही पाणी
किती करतोस त्यांचे पाप
कुठे ठेवलेस त्यांची कोप
==================================
◆ कविता क्र.(2) सावत्र आई ◆
सखुबाई पोराला मारू नको गं
समानतेने वागवत जा गं ।।धृ।।
आपलं म्हणजे बाळ
दुसऱ्याच नाही ते काळ
आपल्याला म्हणू नको छोटं
दुसऱ्याच नाही बघ कार्ट
तेही तुझाच हाय ग ।।1।।
तुझ्याला देते गोड गोड खाया
त्याला दे थोडी तर माया
त्याला आहे भरपूर ज्ञान
तुझ्याला नाही काहीच गॅन
आता जरा विचार कर गं ।।2।।
तुझ्याला देते गोड गोड पोळी
त्याला मात्र भाकरी शिळी
त्याचे करू नको ग हाल
तो आहे अजून बाल
तुला तोच संभाळणार हाय गं ।।3।।
==================================
कविता क्र.(3)
◆ देश स्वतंत्र करण्यासाठी ◆
देश स्वतंत्र करण्यासाठी
आपले नेते लढले दिनराती
आणा पूर्वीचा इतिहास डोळ्यापुढे
आपले नेते होते साधे भोळे ।।1।।
आईची शिकवण घेऊनी
स्वराज्याची पायरी चढली शिवबांनी
मिठाचा सत्याग्रह मोडण्यासाठी
गांधीजींनी प्रयत्न केले दिनराती ।।2।।
हाल सहन करूनी
मुलीची शाळा चालविली सावित्रीबाईंनी
पुत्र पाठीशी घेऊनी
लढली झाशीची राणी ।।3।।
हाल किती केले संभाजींचे बादशहाने
परंतु हिंदू धर्म सोडला नाही संभाजीने
देश स्वतंत्र केला नेत्यांनी प्रयत्नांनी
आदर्श हा घ्यावा आपण सर्वांनी ।।4।।
==================================
कविता क्र.(4)
◆ हे जग ◆
हे जग आहे किती बाद
यांना दारूचाच नाद
श्रीमंताला का मनं देता मान
गरिबांना समजतात लहान
किती होती निवडणुका
पैसा उधळती लाखो लाखा ।।
दारूला घालती पैसा
नुकसान करती ऐसा
गरिबाला करा रे दान
श्रीमंताला देऊ नका मान ।।
करा गरिबाला मदत
नाव मिळवा जगात
गरिबाला केलं यानं दान
आहेस तू भाग्यवान ।।
गरिबाला लाजू नका
श्रीमंताला माजू नका
गरिबांचा करू नका छळ
त्याच्याकडे थोडं तर आहे बळ ।।
==================================
कविता क्र.(5)
◆ शेतकरी ◆
अरे शेतकऱ्या तू किती करतोस कष्ट
मी सांगत आहे खरी गोष्ट ।।
खडक फोडून फोडून
काळी केली तू जमीन
या खडकात या खडकात
सोनं आहे पिकवत ।।
घाम गाळून गाळून
या खडकाची केली तू काळी जमीन
किती कष्ट केले रे तू
नि झाला मनाने श्रीमंत तू ।।
तुझे कष्ट जाणार नाही वाया
या काळ्या धरणीची माया
ही धनसंपत्ती इथेच राहणार
तू इथून निघून जाणार ।।
==================================
कविता क्र.(6)
◆ भोळा शेतकरी ◆
अरे भोळ्या शेतकच्या
आवड तुला कामाची रे ।।धृ।।
तू आहे खूप कष्टाळू
सोन्यासारखे पिकवले साळू
रातोराती पाजतो पाणी
बैला मागे म्हणतो गाणी
पोशिंदा आहे जगाचा साऱ्या
अरे भोळ्या शेतकऱ्या ।।1।।
तू किती करतोस कष्ट
तूच आहे पहिला फर्स्ट
तुझी झोपडी रे
जाणार नाही चोरीला रे
तुझ्या घरात दिसताहेत चांदण्या साऱ्या
अरे भोळ्या शेतकऱ्या ।।2।।
==================================
कविता क्र.(7)
कोड शेतकऱ्यांचं
माळाचं झालं कराड कराड
शेतकऱ्याला पडलं आता कोडं
कुठं न्यायची जनावरं
गेला पाऊस दूर दूर
अरे पावसा पावसा
शेतकऱ्याचा जीव झाला कासा विसा
तुझी वाट पाहून पाहून
गेले त्याचे डोळे सुकून
त्यांनं पिकवलं सोना
तिथं आहे तुझाचं मान
असा कसा आहे दुष्काळ
उन्हा न पेटलं माळ
==================================
कविता क्र.(8)
कशाला काय म्हणू नही
जिथे झाड नाही
त्याला जंगल म्हणू नये
जिथे पीक नाही
त्याला शेती म्हणू नही ।।
ज्याला पाला नाही
त्याला झाड म्हणू नये
जिथे पाणी नाही
त्याला नदी म्हणू नही
जो अभ्यास नाही करत
करत नाही त्याला विद्यार्थी म्हणू नही
जो स्टार गुटखा खातो
त्याला माणूस म्हणू नही
जो आई-वडिलांना विसरला
त्याला मुलगा म्हणू नही
जो स्वतःसाठी जगतो
त्याला माणूस म्हणून नही
जिथं घरपण नही
त्याला घर म्हणून नही
जिथे देव नाही
त्याला देऊळ म्हणून नही
जिथं माती नही
त्याला जमीन म्हणू नही
जिथे सावली नाही
त्याला झाड म्हणू नही
उष्णता उजेड देत नही
त्याला सूर्य म्हणू नही
==================================
कविता क्र.(9)
शासनाने शाळेकडे दुर्लक्ष केलंया
शासनाने शाळेकडे आता दुर्लक्ष केलंया
हा मुलगा का शिकत न्हाय
ही मुलगी का शिकत न्हाय
याचा विचार शासन करत न्हाय
शासनाने आता शाळेकडे दुर्लक्ष केलं .....।।1।।
गरीबी परिस्थितीमुळे मुलं आता
शाळा शिकत न्हाय
याचा विचार कोणीही करत नाही
सगळे आहेत स्वतःसाठी
नेते काय सांगून गेलेत याच ते विचार करत न्हाय
शासनाने शाळेकडे आता .......।।2।।
शाळेत काही येत नाही म्हणून
शिक्षक आता मंद मुलाला काढतोय
प्रयत्नांची शिस्त तो लावून लावत नाही
शिक्षक आता हुशार विद्यार्थ्यांचा विचार करतोय
शासन आता शाळेकडे दुर्लक्ष केलंया
==================================
कविता क्र.(10)
प्रयत्न सोडू नको
प्रयत्न सोडू नको या कवितेचे फक्त शीर्षकच आहे वहीमध्ये लिहिलेले कविता कदाचित पाने फाडून टाकले आहेत. असं का झालं असावं हे सांगता येत नाही. तिच्या मनाची अवस्था मी सांगू शकत नाही......! मात्र वरील नऊ कविता 13 वर्षाच्या मुलीने लिहिल्या आहेत याचं आश्चर्य आताही वाटतं. प्रयत्न सोडू नको असं कवितेतून जगाला सांगताना मात्र तिने प्रयत्न सोडलेले दिसतात. कदाचित कवितेतील शब्द तिला लागू पडत असावेत आणि तिला स्वतःला विरोधाभास झाला असावा.....! आजही त्या कवितेतील शब्द तिच्या मनात घोळत असावेत….......असो....!
प्रत्येक शाळेमध्ये वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. इंग्रजी भाषेचे अध्यापन हा खरोखरच माझा आवडीचा विषय होता. शिकवणे हे एक केवळ सोपवलेले किंवा लादलेले काम नसून विद्यार्थ्यांना रुचेल समजेल अशा भाषेत, सोप्या पद्धतीने समजावून देण्याचा नेहमी माझा अट्टाहास होता.
महानोर सरांनी लेख तयार केला , मला वाचायला दिला. मलाही बरं वाटलं. दुसऱ्या दिवशी मी शाळेत गेलो. आज आपण काही झालं तरी सोनालीचा नंबर मिळवायचा आणि संपर्क साधायचा. असा निश्चय केला. मी अनेकांना फोन केला आणि नंबर मिळवला. नंबर डायल केला.
हॅलो ! कोण ?
या प्रश्नावर , "मी आण्णाराव पाटील सर, बोलतोय."
असं म्हणताच क्षणभर काहीच आवाज आला नाही.
बहुतेक चुकीचा नंबर असावा , असं वाटलं. पण फोन चालूच होता. पा.....टील ...स....र...!
गहिवर आणि हुंदका मिश्रित आवाज कानावर आला. मला काय बोलू आणि सर मी कसं व्यक्त होऊ हे कळत नाही. सर ! आज पुन्हा एकदा माझ्या पप्पांची आठवण झाली. हे शब्द ऐकताच माझे डोळे पाणावले. मला अश्रू आवरता आले नाहीत आणि लपवता ही आले नाहीत.........!!
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
या ब्लॉगच्या होम पेज वरील कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शन ला जा आणि इतर ब्लॉग वाचा .आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना whatsapp, facebook द्वारे शेअर करा .
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
No comments:
Post a Comment