माझे इतर लेख वाचण्यासाठी ब्लॉगच्या होम पेज वर कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शनला जा आणि आपल्या आवडीचा ब्लॉग वाचा. आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना whatsapp, facebook द्वारे शेअर करा. किंवा पेजची लिंक तुमच्या whatsapp ग्रुपला share करा.धन्यवाद.....!

Monday, October 26, 2020

राज्यातील 300 शाळा होणार आदर्श शाळा (Model School )

 


जिल्हा परिषद शाळांचे  लवकरच रूप बदलणार 

महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद शाळांपैकी ३०० शाळा आदर्श शाळा (Model School) म्हणून विकसित करण्याबाबत ,महाराष्ट्र शासनाने नुकतेच परिपत्रक काढले आहे .

    महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने  दि.26/10/ 2020 रोजी परिपत्रक काढून जाहीर केले आहे.   महाराष्ट्र राज्याच्या  मार्च, २०२० मध्ये पार पडलेल्या  द्वितीय (अर्थसंकल्पीय) अधिवेशनात घोषणा केल्यानुसार शालेय शिक्षण विभागाने पहिल्या टप्प्यात राज्यात ३०० जिल्हा परिषद शाळा "आदर्शशाळा"  ( Model School )"  म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. काही निकषांच्या आधारावर साधारणत: प्रत्येक तालुक्यातून १ अशा महाराष्ट्रातून ३०० शाळा निवडण्यात आल्या आहेत. निवडलेल्या आदर्श शाळा शक्यतो किमान इयत्ता १ ली ते ७ वी वर्गाच्या जिल्हा परिषद शाळा असतील व गरज पडल्यास त्यात ८वी चे वर्ग जोडण्यास वाव असेल. त्यांची जिल्हा निहाय यादी देखील शासनाने प्रसिद्ध  करण्यात आली  आहे .

 महाराष्ट्र राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी सदर यादी अंतिम करण्यासाठी त्यातील निवडलेल्या शाळांची पुष्टी (confirm) करावी व शासनास १५ दिवसात कळवावे. एकदा आदर्श शाळांची यादी निश्चित झाल्यानंतर सर्व शासकीय, जिल्हा स्तरीय व ग्राम- स्तरीय योजनांचे convergence करुन सदर शाळांना विकसित करण्याचा उपक्रम हाती घेण्यात येईल.

"आदर्श शाळा म्हणजे काय ? त्याचे निकष व परिभाषा काय अपेक्षित आहेत, याबद्दल

खालीलप्रमाणे स्पष्टीकरण करण्यात  आले आहे:

आदर्श शाळा निर्मितीमध्ये तीन महत्वाचे भाग असतील. यामध्ये भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता आणि काही प्रशासकीय बाबी यांचा समावेश राहील.



(1)भौतिक सुविधा:- 

भौतिक सुविधेमध्ये स्वतंत्र शौचालये, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सुस्थितीत असलेले वर्ग, आकर्षक इमारत, क्रीडांगण, क्रीडा साहित्य, ICT लॅब, सायन्स लॅब, ग्रंथालय यासारख्या भौतिक सुविधांचा समावेश राहील. आजूबाजूच्या गावांपासून व शाळांपासून दळणवळणासाठी रस्ते असतील. भविष्यात विद्यार्थी संख्येत वाढ झाल्यास. इमारत व भौतिक सुविधांचा विस्तार करण्यासाठी पुरेसा वाव असेल.



२. शैक्षणिक गुणवत्ता:-

 शैक्षणिक गुणवत्तेमध्ये विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी उत्तम शैक्षणिक पोषक वातावरण उपलब्ध राहील. पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे जाऊन शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतील. विद्यार्थ्यांना व्यवस्थितपणे लिहिता वाचता यायला पाहिजे. वर्गात उभे राहून वाचनावर भर देणे गरजेचे आहे, वाचनाचा सराव आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना प्राथमिक स्तरावर भाषा व गणित विषयातील मुलभूत संकल्पना ; त्यात वाचन, लेखन व गणिती क्रिया अवगत होणे अनिवार्य असणार आहे. शाळेच्या ग्रंथालयामध्ये निरनिराळी गोष्टींची पूरक वाचनाची पुस्तके आणि संदर्भ ग्रंथ, इनसायक्लोपिडिया उपलब्ध असतील. स्वअध्ययनासोबतच गट अध्ययन यासारखे रचनात्मक पद्धतीने शैक्षणिक कार्यक्रम राबविले जातील.

आदर्श शाळेतील २१व्या शतकातील कौशल्य जसे-नवनिर्मितीला चालना देणारे (Creative thinking), समीक्षात्मक विचार (Critical Thinking), वैज्ञानिक प्रवृत्ती (Scientific Temperarment), संविधानिक मुल्ये अंगी बाणविणे, सोबत काम करण्याचे कौशल्य (Collaboration), संभाषण कौशल्य (Communication) या सारखी अन्य कौशल्ये जाणीवपूर्वक विकसित करण्यात येतील. आदर्श शाळेकडे लोक आकर्षित होऊन इतर शाळा सोडून या शाळेत आपल्या पाल्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी पाठविण्यास तयार  होतील.

 पालक त्यांच्या पाल्याच्या सर्वांगीण गुणवत्ता व व्यक्तीमत्व विकासासाठी विविध शालेय व सह शालेय उपक्रमात सहभाग घेण्यासाठी तयार असणे हे ती शाळा आदर्श शाळा असल्याचे दर्शवते.

आदर्श शाळेमध्ये वातावरण हे प्रसन्न असावे. विद्यार्थ्यांना शाळेत यावेसे वाटणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना शनिवारी व रविवारी देखील शाळेत यावेसे वाटले पाहिजे. मुलांनाआनंददायी शिक्षणाचा अनुभव मिळेल. 

आदर्श शाळांमध्ये विद्यार्थ्यांना कृतियुक्त शिक्षणातून (Activity Based Learning) स्वतःला ज्ञानाची निर्मिती करता येईल. रचनात्मक व आनंददायी शिक्षणातून त्यांना कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त विषयाचे शिक्षण अवगत करता येईल. शिक्षकांनी पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे जाऊन मुलांना शिकवावे. संकोच न करता, न घाबरता विद्यार्थी प्रश्न विचारण्यास उत्सुक असतील व त्यातून चिकित्सक वृत्तीमध्ये वाढ होईल. 



३. प्रशासकीय बाबी:- 

आदर्श शाळेत शिक्षकांची काम करण्याची इच्छा असेल, तेथे बदलीने येण्याची तयारी असेल, किमान ५ वर्ष तेथे काम करण्याची तयारी असेल, शिक्षक तेथून बदलीची विनंती करणार नाहीत, अशी शाळा म्हणजे आदर्श शाळा होय. 

     शिक्षणातून मुलांचा शारीरिक, बौद्धिक व मानसिक विकास होणे हे आदर्श शाळेचे मुख्य उद्धिष्टे असेल. विद्यार्थ्यांमध्ये विविध विषयातील अध्ययन फलनिष्पतीसह त्यांना सध्याच्या स्पर्धात्मक युगात विविध आव्हानांना सामोरे जाण्यासाठी त्यांच्यामध्ये नेतृत्वगुण विकसित करून त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी त्यांना विविध सहशालेय उपक्रमात जसे- क्रीडा, भाषण, लेखन,अभिनय, गायन व अन्य विषयांमध्ये प्राविण्य मिळवून देणारी तसेच विविध क्षेत्रातील कौशल्ये विकसित करणारी शाळा म्हणजे आदर्श शाळा होय.

वरील बाबींची पूर्तता करणाऱ्या शाळेस "आदर्श शाळा" म्हणून संबोधता येईल. अशा प्रकारच्या राज्यातील प्रत्येक तालुक्यातून साधारणत: एक शाळा समृद्ध करावयाची आहे. सदर शाळा अन्य शाळांना प्रेरणा व मार्गदर्शन करण्याचे काम करेल तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२० (NEP) मध्ये नमुद "School Complex" ह्या संकल्पनेप्रमाणे जवळच्या अन्य शाळातील विद्यार्थ्यांना व शिक्षकांना या शैक्षणिक सोयी- सुविधांचा लाभ घेता येईल. या शाळांची गुणवत्ता, मुलांची शैक्षणिक प्रगती, शिकण्याची गती. त्यांचे सामाजीकरण, त्यांचा होणारा सर्वंकष व्यक्तिमत्व विकास पाहून अन्य शाळांमधील पालक त्यांच्या मुलांना अशा समृद्ध शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी उत्सुक राहतील. भविष्यात टप्या-टप्यात या मुलांना वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करावे.



     विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी ताण विरहीत वातावरण मिळावयास हवे . पाठ्यपुस्तक  व दप्तरातील साहित्याच्या पलीकडे जाऊन त्यांना शाळेत शाळेच्या परिसरातील उपलब्ध  सामग्रीमधूनही विविध विषयातील ज्ञान अवगत करता यावे याकरिता त्यांना आठवड्यातून किमान एक दिवस तरी दप्तराच्या ओझ्यापासून मुक्तता मिळावी याउद्देशाने प्रत्येक शनिवारी दप्तर मुक्त शाळा हा उपक्रम आदर्श शाळेच्या माध्यमातून प्रभावीपणे राबविण्यात येईल. 

महाराष्ट्र शासनाने या परिपत्रकासोबत यादी प्रसिद्ध केली आहे. प्रत्येक जिल्हा परिषदेने  आपल्या कार्यक्षेत्रातील निवडलेल्या आदर्श" शाळांची उपरोक्त निकषांच्या आधरे पडताळणी करून, त्यात काही बदल असल्यास ते दिनांक ०६ नोव्हेंबर, २०२० पर्यंत या कार्यालयास कळवण्याविषयी सांगितले आहे . जिल्ह्यांकडून काही अभिप्राय प्राप्त न झाल्यास सदर शाळांना आपली संमती आहे असे गृहीत धरून ती अंतिम करण्यात येईल.

 सदर निर्णयाचे  शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२०१०२६१७२०१९०८२१ असा आहे. मा.वन्दना कृष्णा अपर मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांनी परिपत्रक काढून राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद,यांना कळविले आहे. त्याचबरोबर अधिक माहितीस्तव सादर- १. मा. मंत्री, शालेय शिक्षण यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई २.मा. राज्यमंत्री, शालेय शिक्षण यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई ३. मा. राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई. ४.प्रत: माहिती व आवश्यक कार्यवाहीस्तव आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे ५.शिक्षण संचालक (प्राथमिक / माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे. विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व) ६.प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व) ७. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), जिल्हा परिषद (सर्व) यांना काळविणेत आलेले आहे . 

अशाप्रकारच्या शाळा प्रत्येक तालुक्यात तयार  झाल्यास, भविष्यात  प्रत्येक तालुक्यातून मॉडेल स्कुल ची संख्या वाढत जाईल . जिल्हा परिषदेच्या शाळा कात टाकून नव्या जोमाने कामाला लागतील आणि ग्रामीण  भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळू शकेल . त्यामुळे ग्रामीण भागातील  पालकांना  एक आशादायी वातावरण तयार होईल ..


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


#####################################
🙏🙏🙏🙏🙏
 इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
 bhausahebmahanor.blogspot.com
ला भेट द्या./ ब्लॉगला फॉलो करा.
🙏🙏🙏🙏🙏
  एखादा ब्लॉग आवडल्यास , पोस्ट वाचताना उजव्या कोपऱ्यात वरील ऑपशन(तीन टिंब ) वर  जाऊन आपल्या मित्रांना  whatsapp किंवा facebook द्वारे  share करु शकता.
🙏🙏🙏🙏🙏


1 comment: