सावधान कोरोना अजून गेला नाही.
गेले सात महिने कोरोनाने जगाचे आणि साऱ्या भारतीयांचे जगणे हैराण करून टाकले आहे .
आता आपण सारे
कोरोना सोबत जगायला शिकू या ....!
काळ भयानक कठीण आलाय.......!
20 ऑक्टोबर 2020 रोजी भारताचा रिकव्हरी रेट 87% तर महाराष्ट्राचा 85% वर गेला आहे. आणि केवळ 12 ते 13 टक्के रुग्णांवर सद्यस्थितीत उपचार सुरू आहेत .मृत्युदर भारतात 2 टक्के च्या आसपास आहे तर महाराष्ट्रात अडीच तीन टक्क्यांपर्यंत आहे . घाबरून अस्वस्थ होण्याचे काही कारण नाही .पण आता मला काय होतंय म्हणून गाफील राहता काम नये . सुरुवातीला मे ते जुलै पर्यंत कोरोनाबाधित विषयी आकडेवारीच्या बातम्या यायच्या. मनात थोडी धाकधूक व्हायची . पण, आता अनेक परिचित, नातेवाईक अन् थेट मित्रांच्या मृत्यूच्या बातम्या कळायला लागल्या अन् काळजाचा थरकाप व्हायचा . मुंबई,पुणे ,नाशिक आणि नागपूर शहरातील प्रत्येक कोविड रुग्णालय हाऊसफुल्ल होत होती . आता हळू हळू रुग्ण वाढीचा वेग कमी झाला आहे .अगोदर पैसे भरणाऱ्यांना बेड मिळतात, अशी चर्चा कानावर यायची. आता ते ही बंद झालंय.
कोरोना उच्चतम पातळीवर होता तेव्हा त्याने कोणाला सुध्दा सोडले नाही. माणूस मरायचा. त्याला परस्पर जाळलं जायचं. स्मशानभूमीत नंबर लागले होते. प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात दिलं जात नव्हते . सावडायला राख सुद्धा मिळत नव्हती.
अजूनही एखादा पेशंट सापडला तरी परिवार काळजीत सापडतोय अन् कितीही काळजी घेतली, तरी संसर्ग न होणं आता माणसाच्या हातात राहिलेलं नाही. कितीही खबरदारी घेतली तरी कोरोना होणार नाही याची शाश्वती अजूनही उरलेली नाही. नुसता डोक्यात, मनात कहर माजलाय. घराभोवतीने वणवा लागावा अन आपलं घर वणव्याची वाट बघत तटस्थ उभं असावं अशी परिस्थिती निर्माण झालीय. सगळंच भावनाशून्य होताना दिसतंय. जीवावर उदार होवून पोटापाण्यासाठी बाहेर पडायचं. कोरोनाची धास्ती घेऊन माघारी घरी यायचं. सगळं कुटूंब दगावण्याची भीती काळजात कळ मारत राहतेय. आधी कोरोना शहरा शहरात सापडायचा, आता वार्डा वार्डात सापडतोय. खेडोपाडी, वाड्या वस्त्यावरची माणसं उचलून दवाखान्यात भरती केली जात आहेत. मेलेला माणूस घरापर्यंत येत नाही, शिल्लक माणसांना चौदा दिवसाचा विजनवास पदरी यायचा . कोरोना ग्रस्त सापडला तरी आता त्याला घरातच डांबून ठेवलं जातंय. जगला तर जगला, मेला तर मेला. आभाळ फाटलंय, ठिगळं लावायला जागा उरली नाही. बिकट परिस्थिती आहे. ज्याचं जळतंय त्यालाच फक्त कळतंय. बाकीचे सगळे खुशाल आहेत, गाफील आहेत.
जात्यासाठी आपला अजून नंबर आलेला नाही या मिथ्या समाधानात सुपातले मश्गूल आहेत. कुणाचे सांत्वन करायचे, कुणाला धीर द्यायचा..? अजून मेलो नाही म्हणून जिवंत आहे असे म्हणायची वेळ आलेली आहे.
या ( मानवनिर्मित ) आपत्ती मध्ये वैद्यकीय क्षेत्रातील माणसांनी मनापासून सहकार्य केले. गावाकडे आईवडील रामभरोसे आहेत. वाईट बातमी येवू नये म्हणून रोज त्या नसलेल्या देवाचा धावा करायचा. पहाटे पहाटे मोबाईल खणखणू नये म्हणून त्या संकल्पनेतील विधात्याची करुणा भाकायची. जणू फिल्टर लावलाय. रोगीष्ट, आजारी, गळून गेलेले, पिकून गळून पडायला आलेले, ब्लड प्रेशर, शुगरने पोखरलेले या तडाख्यात सापडले की पुन्हा उठत नाहीत. तारुण्य, प्रतिकारशक्ती, धडधाकट प्रकृती, सगळ्या गैरसमजूती आहेत. कोरोनाच्या तुम्ही नजरेत भरला की कोरोना तुम्हाला उचलून नेणार! कसलााीहीी सला निकाषी जगतील ते जगतील, मरतील ते मरतील, सरधोपट गणित आहे, कसलंही लॉजिक नाही. काळजी घ्या, नका घेऊ. तुमच्या हातात तुमचं जगणं उरलेलं नाही. वणवा विझवायला आगीचे बंब पाठवण्याऐवजी आम्ही रॉकेल भरलेले टॅंकर पाठवतोय.
पण आज कोरोनाची तीव्रता कमी व्हायला लागली आहे ,मात्र आता मात्र सगळंच अनलॉक करुन ठेवलंय. बस,मेट्रो सुरू झाल्या. मुंबई लोकल रेल्वे आता काही दिवसांनी सुरू होतील. पर्यटन स्थळं हळूहळू सुरू होतील .मंदिर उघडण्यासाठी सारीच घंटा वाजवू लागलेत . बाजार सर्रास चालू झालेत .जणू मृत्यूचं श्वापदच खुलं केलंय. आम्ही मृत्यू अनलॉक केलाय.पण शाळा मात्र सुरू करू नका , असा सूर सारी कडून ऐकायला मिळतोय. पण थोड्याच दिवसात शाळा सुरू होतील.भीत भीत आपल्याला वावरवं लागेल.घराबाहेर कुणी सुरक्षित नाही, काही दिवसातच घरेपण असुरक्षित होतील. मृत्यू चुकवणं अवघड होऊन जाईल. सगळंच बेभरोसे होईल. मेलो नाहीच तर जिवंत राहू...!
आता आपण साऱ्यांनी कोरोनाला संयमाने घ्यायला पाहिजे .कोरोनाला जाणीवपूर्वक लांब ठेवले पाहिजे . कोरोनाच्या सोबत राहायला शिकले पाहिजे .
वेळ हातातून निसटताना दिसतेय. सावधगिरी... एवढाच पर्याय शिल्लक दिसतो. सारखं गरम पाणी पिऊन पोटाचा अन् वाफ घेऊन नाकाचा भुगा व्हायची वेळ आलीय. म्हणून कळकळीची विनंती. डायबेटीस, बीपी, कॅन्सरचे आजार असतील तर घरातच रहा! गर्दीत, लग्नात, मयतीस, दहाव्यास जणे टाळा!अगदी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा! तोंडाला रुमाल किंवा मास्क लावा! नियम पाळा! लस येईपर्यंत....!!!
गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.नियमित हात धुवा .मास्कचा वापर करा .वेळोवेळी हात स्वच्छ धुवा ....
सोशल डिस्टनसिंग आवर्जून पाळा. आणि कोरोनाला दूर ठेवा ... आता सगळंच अनलॉक होतंय.कोरोनाचा राक्षस आपल्या भोवती वावरतोय.....त्याला दूर ठेऊनच आपण सुरक्षित राहू शकतो ......
तोंड, नाक, डोळ्याव्दारे
शिरतो आपल्या शरीरात ।
निर्माण करतो घरआपले
मानवाच्या फुफ्फुसात ।।
नको खोकणे,शिंकणे,थुंकणे
आता तरी चारचौघात ।
विषाणचा प्रसार थांबवू
करुया बदल वागण्यात ।।
अंतर ठेवूया सुरक्षित
मनाने जवळ राहू या ।
रोगाविरुद्ध लढण्याची
इच्छाशक्ती प्रबळ करु या ।।
वापरु नेहमीच मास्क
लावू सँनिटायझर ।
हात धुवू साबणाने
वेळोवेळी वरचेवर ।
कमी करु कहर आता
कोरोनाच्या विषाणूचा ।
लढा आणखी करु तीव्र
सामूहिक जागृतीचा ।।
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
#####################################
🙏🙏🙏🙏🙏
इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
bhausahebmahanor.blogspot.com
ला भेट द्या./ ब्लॉगला फॉलो करा.
🙏🙏🙏🙏🙏
एखादा ब्लॉग आवडल्यास , पोस्ट वाचताना उजव्या कोपऱ्यात वरील ऑपशन(तीन टिंब ) वर जाऊन आपल्या मित्रांना whatsapp किंवा facebook द्वारे share करु शकता.
🙏🙏🙏🙏🙏
very nice mahanor सर
ReplyDeleteThnx
ReplyDelete