कोरोनाचा कहर-ऑनलाईन शिक्षण सर्वांची डोखेदुखी
भारतात आता कोरोनाग्रस्तांची संख्या 45लाखांहून अधिक झाली आहे. अमेरिकेत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 56 लाखांच्या वर असून , ब्राझिलमध्ये 30 लाख तर भारतात 45 लाखांपेक्षा जास्त झाली आहे. आज भारत ब्राझीललाही मागे टाकून जगात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. जगाच्या तुलनेत भारतामध्ये कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज सप्टेंबर 2020 महिन्यात दिवशी 24 तासात 90 हजाराच्या पुढे आकडा जात आहे .कदाचित भविष्यात दिवसाला लाखाच्या वर आकडा वाढत जाईल ,भारत थोड्याच दिवसात अमेरिकेच्याही पुढे जाईल . कोविड 19 च्या प्रभावाखाली असलेल्या जगातील काही देशात कोरोना रुग्ण वाढीचा दर कमी झालेला पाहायला मिळतोय .पण भारतात अजूनही रुग्ण वाढीचा दर कमी झालेला नाही . रुग्ण वाढ आटोक्यात आलीच पाहिजे आणि रिकव्हर पण झाले पाहिजेत . शासन आणि प्रशासन युद्ध पातळीवर प्रयत्न करतंय . पण म्हणावं तसं यश मिळत नाही .
कोविड 19 (कोरोना) मुळे भारतीय अर्थव्यवस्थेचे अक्षरशः कंबरडे मोडून जाण्याची भीती आज निर्माण झाली आहे. आता ही वेळ केवळ आकडे मोजण्याची नाही ,तर याला खरोखरंच गांभीर्याने घेण्याची आहे . या वाढत्या रुग्ण वाढीला आवर घातला नाही तर भारताची अवस्था भयाण होणार यात काही शंका नाही . शहरी भाग व्यपुन कोरोना आता ग्रामीण भगत आपले पाय पासरतोय .
त्यातच आता मुबई सोडून देशामध्ये मेट्रो सेवा चालू होत आहे . यानंतर कोरोनाची परिस्थिती अधिकच गंभीर होण्याची चिन्हे आहेत . मुंबईची लोकल एक नोव्हेंबर पासून सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे .
ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत आहे. एकीकडे रुग्णांची संख्या वाढत असतानाच दुसरीकडे पर्यायी आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत असल्याने रुग्णांच्या उपचारांची हेळसांड होत आहे. त्यामुळे मृत्यू संख्या वाढत चालली आहे, ही मोठी चिंतेची बाब आहे.
अशा परिस्थितीत शाळा सुरू करण्याचा अट्टाहास महागात पडू शकतो हे सत्य . शासनाने जाहीर केल्या प्रमाणे ,शाळा बंद पण शिक्षण सुरू या योजनेला हातभार लावण्यासाठी अनेक शाळा-कॉलेजांनी ऑनलाईन शिक्षण चालू केले .पहिल्यांदा ऑनलाईन शिक्षण हा एक आशेचा किरण वाटत होता. पण हेच ऑनलाईन शिक्षण दुधारी शस्त्र अन् सोन्याची सूरी ठरत आहे . ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली काही शाळांनी शिक्षणाचा अतिरेक चालवला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वेगळ्याच आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. सततच्या ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांच्या शारीरिक आणि मानसिक समस्यांची चिंता पालकांना सतावू लागली आहे. शिक्षक आणि शिक्षण संस्था अभ्यासक्रम पूर्ण करण्याची घाई करत आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांना सतत मोबाईल आणि लॅपटॉपसमोर बसावे लागते आहे. ही अवस्था आता धोकादायक ठरू लागली आहे. मुळात ज्यांच्याकडे मोबाईल, लॅपटॉप नाहीत ,त्या मुलांचे शिक्षण मात्र खंडित झाले आहे. शिक्षणापासून वंचित असणाऱ्या मुलांची आकडेवारी तशी फार मोठी आहे, त्यामुळे सध्या जे शिक्षण दिले जात आहे, ते फक्त श्रीमंत आणि उच्चभ्रू मुलांसाठीच दिले जात आहे असाही समज सामान्य जनतेतून होत आहे . ऑनलाईन शिक्षण चालू आहे ,ते ही ओढून ताणून शिक्षण प्रवाहात आणण्याच्या अट्टहासापायी. विद्यार्थी ऑनलाईन अभ्यासाला जॉईन होतात पण मोबाईल आई वडिलांचा काकांचा ,मावशीचा ,मामाचा ,शेजाऱ्याचा , मित्राचा असतो ; विद्यार्थ्यांचा स्वतःचा असा मोबाईल नसतोच नसतो . आता उपलब्ध वेळ याचा देखील विचार व्हायला हवा . वडीलधारी माणसं दिवस भर लहान मुलांच्या हातात मोबाईल देऊ शकत नाहीत . पुन्हा मग डेटा प्रॉब्लम ,कनेक्टिव्हिटी चा प्रॉब्लम . ऑनलाईन तास सुरू झाल्यानंतर अर्ध्या तासांपर्यंत वेळ मिळेल तसं जॉईन होणारी संख्या .यामुळे सर्वांनाच त्रास होतो . तरीही फेस टू फेस शिक्षणात विदयार्थी सांगून ऐकत नाहीत .त्याचा प्रत्यय ऑनलाईन शिक्षणात ही येतो . मुलं ऑनलाईन शिक्षण तासाला जॉईन होतात खरं ! पण व्हिडीओ आणि माईक म्युट करतात आणि प्रेजेंटी दाखवतात . म्हणजे प्रत्यक्ष शिकण्यापेक्षा उठाठेव अधिक होते .
पुन्हा मागास, वंचित घटकांतील मुले शिक्षणात मागे राहणार याची भीती वेगळीच. मजूर ,कारागीर छोटे व्यावसायिक यांच्याकडे आर्थिक मंदीआहे . दररोज डेटा उपलब्ध करण्यासाठी पैसे आणायचे कोठून ? असा प्रश्न पालकांना पडत आहे. काही मुलांच्या पालकांनी पाल्याची इंटरनेट सेवाच बंद करून टाकली आहे. ते का ? हे आता वेगळं सांगायला नको . त्यामुळे जॉईन होणारी मुले देखील ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहू लागली आहेत. मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे पालक चिंतेत असतानाच त्यांना घरी बसल्या आर्थिक भुर्दंडही सोसावा लागत आहे. त्यामुळे हे ऑनलाईन शिक्षण मला वाटत नाही की फार काळ टिकेलं ! ही केवळ गाजराची पुंगी वाटत आहे .ही वस्तुस्थिती आहे. मान्य करावी लागेल .
लॉकडाऊन च्या काळात मुलांचा शारीरिक व्यायाम झाला नाही, त्यामुळे शारीरिक त्रासाने डोके वर काढले आहे. शिवाय डोळ्यांच्या समस्याही जाणवू लागल्या आहेत. पाठयांश समजून घेताना 'फेस टू फेस' शिक्षणात जसं आकलन होतं तसं ऑनलाईन शिक्षणात घडत नाही . परिणामी विदयार्थी अभ्यास पूर्ण करत नाहीत. हे प्रत्येक शिक्षकाला अनुभव आला असेल . अभ्यास विचारतील म्हणून ऑनलाईन क्लासला जॉईन होत नाहीत . मराठी विषयाची हि अवस्था आहे .मग गणित ,विज्ञान आणि इंग्लिश विषयाची अवस्था काय असेल ?
शिक्षकाचा दैनंदिन धाक , कनेक्टिव्हिटी तुटल्याने विदयार्थी बिनधास्त झाले आहेत .अशा परिस्थिती मुळे विद्यार्थ्यांची मानसिक कल आता बिघडत चालला आहे.
शासनाने 25 टक्के अभ्यासक्रम कमी केला आहे खरं आहे , मात्र काही शाळांनी हा वगळलेला अभ्यासक्रम अगोदरच शिकवला आहे. आता त्याचा काहीच उपयोग होणार नाही.
21 सप्टेंबर पासून शाळा सुरू होतील ,पण विदयार्थ्यांना शाळेत येण्यासाठी पालकाची सहमती पाहिजे . आणि पुन्हा प्रॉब्लम वाढणार .शेवटी ही एक ट्रायल घ्यावी लागणार आहे . याला सर्वांनी संयमाने घ्यायला हवे .9 वी ते 12 वी शाळा सुरू झाल्यानंतर प्राथमिक शाळा सुरू होणार .ते ही अजून अंधारात आहे .
कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अजून प्राथमिक शाळा कधी सुरू होणार याची निश्चितता नाही. शिक्षणापेक्षा जीव महत्वाचा आहे सर्वांना . मूलाने यावर्षी अभ्यास नाही केला तरी चालेल.वर्ष वाया गेले तरीही चालेल .पण आधी लस मग शाळा अशा पवित्र्यात सर्व पालक आहेत . मग सध्या काही शाळा- कॉलेज कडून हा जो ऑनलाईन अभ्यासक्रम उरकण्याचा प्रयत्न चालला आहे, तो काहीच कामाचा नाही. शाळा सुरू व्हायला अजून जानेवारी उजाडेल . कदाचित पुढचे वर्ष देखील उजाडेल. त्यामुळे मग आणखी अभ्यासक्रम कमी करावा लागेल अथवा शैक्षणिक वर्षच ड्रॉप (रद्द) करावे लागेल. मग जर शैक्षणिकवर्ष ड्रॉप करावे लागत असेल तर मग हा ऑनलाईन शिक्षणाचा अट्टाहास का ? अनिश्चितता असताना ऑनलाईन शिक्षणाचा आणि अभ्यासक्रम उरकण्याचा अट्टाहास का, असा प्रश्न निर्माण होतो. म्हणजे अभ्यासक्रम आणखी कमी करणे किंवा शैक्षणिक वर्ष रद्द करणे अशी नामुष्की ओढवली तर सध्या अभ्यासक्रम उरकण्याचा जो खटाटोप चालला आहे, तो सगळा पाण्यात जाणार आहे.
जी मुलं या ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहिली आहेत, त्या मुलांच्या भवितव्याचे काय? मुळात शिक्षण दहावी आणि बारावीपर्यंत मोफत आहे. मात्र आजच्या घडीला ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली पालकांना आर्थिक भुर्दंड सोसत आहेत. मग हे कसले मोफत शिक्षण?
गेल्या तीन-चार महिन्यात विद्यार्थ्यांना डोळ्यांचे आजार जडल्याचे आणि चष्म्याचे नंबर वाढल्याचे दिसत आहे. शारीरिक समस्याही निर्माण होत आहेत. मुले तासंतास मोबाईलसमोर राहात असल्याने पालकांची चिंता वाढली आहे. याला आवर घातला पाहिजे . ऑनलाईन क्लासेसच्या नावावर काही शाळांनी सुरू केलेल्या मनमानी चालू केली आहे . सध्या विद्यार्थी शाळा-कॉलेज आणि क्लास यांचे तास ऑनलाईन'अटेंड' करत आहेत, यात त्यांचा अधिक वेळ जात आहे. यामुळे शारीरिक व्याधी जडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या सगळ्यांकडे शासनाने आणि शिक्षण तज्ज्ञ म्हणवणाऱ्या मंडळींनी अधिक लक्ष देण्याची गरज आहे. चालू पिढीला ऑनलाईन शिकवून आपण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कमकुवत तरी घडवणार नाही आहोत ना ? याचाही विचार व्हायला हवा. यंदाचे शैक्षणिक वर्ष अनिश्चित गर्तेत सापडले असताना मुलांच्या आरोग्याशी हा खेळ का चालवला जात आहे? आगामी सगळा काळ अनिश्चित आहे , मग ऑनलाईन शिक्षणाची घाई का ?
#####################################
🙏🙏🙏🙏🙏
इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
bhausahebmahanor.blogspot.com
ला भेट द्या./ ब्लॉगला फॉलो करा.
🙏🙏🙏🙏🙏
एखादा ब्लॉग आवडल्यास आपल्या मित्रांना whatsapp किंवा facebook द्वारे share करु शकता.
🙏🙏🙏🙏🙏
No comments:
Post a Comment