आमचं गाव आमची परंपरा - खैराव
सकारात्मक ऊर्जेचे गाव खैराव
शिवकालीन काळात या गावच्या परिसरामध्ये खैराची झाडे भरपूर होती. खैराची झाडे प्रचंड प्रमाणात असल्याने हे गाव प्राचीन काळात "खैरवन" म्हणून परिचित होते.खैरवन या शब्दाचा अपभ्रंश होऊन खैराव हे नाव पडलेले आहे..!!
परिसरातील खैराच्या झाडा पासून कातनिर्मिती, औजारे व शस्त्राला वापरण्यात येणाऱ्या मूठी बनवण्यासाठी खैराच्या झाडाचा वापर होत असे.
महाराष्ट्र राज्यातील सोलापूर व सांगली जिल्ह्याच्या सीमेवर सांगली जिल्हयातील जत तालुक्याच्या ईशान्य दिशेला चोवीस कि.मी.अंतरावर हे गाव वसले आहे. गावचा स्थान कोड क्रमांक ५६८८५३असा आहे.
गावामध्ये विविध जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहत आहेत. या गावचे क्षेत्रफळ "२२९१" हेक्टर असून २०११च्या जनगणनेनुसार या गावात ३४७ कुटुंबे राहत आहेत. गावची एकूण लोकसंख्या सुमारे १९६३ इतकी आहे. गावच्या नैऋत्य- ईशान्य दिशेने एक पाण्याचा ओढा वाहत आहे.
तर गावच्या वायव्य दिशेला एक छोटे पाझर तलाव आहे. खैराव गावचा पिन कोड नंबर ४१६४०४असा आहे.
ग्रामपंचायत
खैराव गावची ग्रामपंचायत स्थापना १९५६ साली झाली असून सरपंच व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामसेवक यांच्या मदतीने गावचा विकास केला जात आहे.
महालिंगराया मंदिर
पुरातन काळापासून खैराव गावचे ग्रामदैवत म्हणून महालिंगराया देवाला लोक आपले आराध्य दैवत मानतात. या देवस्थानची जमीन १८ हेक्टर असून येथील पुजारी देखभाल करतात. महालिंगराया देवाची यात्रा वर्षातून दोनवेळा भरते. गावातील भाविक देवाची पालखी घरी नेऊन आपल्या दारात जत्रा साजरी करतात. महालिंगराया हा भक्तांची मनोकामना पूर्ण करणारा देव आहे. अशी लोकभावना व आख्यायिका आहे.
हनुमान मंदिर
खैराव गावच्या वेशीतच भव्यदिव्य असे हनुमान मंदिर आहे. मंदिराचा अलीकडेच जिर्णोद्धार ग्रामस्थांनी केला असून मंदिरावर ४१ फूट उंचीचे नेत्रदीपक असे शिखर बांधले आहे. मंदिरासमोरच नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी ज्ञानेश्वर माऊलीचा अखंड हरिनाम सप्ताह गेली २४ वर्ष सुरू आहे. गावातील मुंबई, पुणे, नाशिक शिवाय महाराष्ट्रात जिथे जिथे नोकरी व व्यवसाय निमित्त बाहेर असणारी सर्व लोक या सप्ताहास येतात. प्रवचन, हरिपाठ, किर्तन व भजन इत्यादी कार्यक्रमामुळे गावातील वातावरण आध्यात्मिक होऊन जाते. काल्याच्या सुश्राव्य किर्तनाने सप्ताहाची सांगता होते.
मरी माता मंदिर
मरीमाता देवीची यात्रा आषाढ महिन्यात भरते. या यात्रेत पालखीची मिरवणूक भक्तगण काढतात. पालखीच्या समोर पोतराज देवीची गाणी हलगीच्या तालावर म्हणून नाचतात. देवीला आंबील बोण्याचे नैवेद्य दाखवतात.
मज्जिद
खैराव गावामध्ये भव्यदिव्य अशी मुस्लिम धर्मांची मज्जिद एक प्रार्थना स्थळ आहे. मोहरम हा इस्लामिक धर्माचा कार्यक्रम गावामध्ये साजरा केला जातो. धाकली खतल व थोरली खतल असे दोन ते तीन दिवस कार्यक्रम चालतो. सर्व हिंदू मुस्लिम एकत्र येऊन खैराव गावामध्ये मोहरम व रमजान सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. या ठिकाणी नमाज पठण करण्यासाठी अनेक भागातून मौलवी येत असतात. हिंदू मुस्लिम ऐक्याची खूप मोठी परंपरा खैराव गावाला लाभली आहे.
लोककला
खैराव गावात भजनी मंडळ आहे. त्याचबरोबर धनगरी ओवीकार मंडळ व वालगीमंडळ ही या गावात आहे. महालिंगराया देवाच्या यात्रे दिवशी ओविकार मंडळ आपल्या वाद्यासह गजी नृत्य हे पारंपारिक नृत्य ढोल कैताळ आणि सनईच्या मधुर आवाजात सादर करतात.
शैक्षणिक, क्रीडा व आरोग्य सुविधा.
खैराव गावामध्ये जिल्हा परिषदेच्या दोन शाळा असून घुटुकडेवाडी येथे इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत शाळा आहे. तर गावामध्ये इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत वर्ग आहेत. गावातच श्री संत भिमदास करांडे महाराज माध्यमिक विद्यालय आहे. या विद्यालयात इयत्ता आठवी ते दहावीचे वर्ग आहेत. गावांमध्ये सर्व शाळा गुणवत्ता पूर्ण शिक्षण देत आहेत.
आरोग्य
आरोग्य सेवा गावात खाजगी दवाखाना असून मेडिकल देखील आहे. आरोग्य सेविका व आशा वर्कर्स यांच्यामार्फत आरोग्याची सेवा दिली जाते.
क्रीडा
क्रीडा क्षेत्रामध्ये खैराव गावातील अनेक तरुणाने प्राविण्य मिळवले आहे. त्यामुळे ते सैन्य व पोलीस दलामध्ये सेवा बजावत आहे.
प्रमुख पिके
येथील जमीन काळी कसदार व माळरान आहे. येथील शेतकरी ज्वारी, बाजरी, गहू, मका, मटकी , तुर,हरभरा,उडीद इत्यादी पिके घेतात. अलीकडे म्हैसाळ जलसिंचनाचे स्रोत निर्माण झाल्यामुळे शेतकरी ऊस , आंबा , केळी, द्राक्ष व डाळींब लागवड करू लागले आहेत.
लोक जीवन
खैराव गावचे लोक बहुदा शेतकरी व कष्टकरी वर्गातील आहेत.दुष्काळी पट्ट्यातील गाव असल्याने सहा सहा महिने ऊस तोड मजूर म्हणून वाळवा, इस्लामपूर व कोल्हापूर या ठिकाणी ऊसतोड कामगार व शेतमजूर म्हणून काम करतात. येथील लोकांचे साधे जीवन असून जेवणामध्ये ज्वारी, बाजरी व गहू इत्यादीचा वापर करतात. भाजीपाला व मटकी, मूग व तूर यांचा वापर करतात. राहणीमान सर्वसाधारण आहे. कष्टाने शेती करतात. शेतीला जोडधंदा म्हणून पशु पालन व कुक्कुटपालन करतात. गावात सहा दुध डेअरी असून पशुखाद्य डेअरी मार्फत शेतकऱ्यांना उपलब्ध केले जाते. आठवड्याला दुधाचे पैसे मिळतात. गावात आठवडा बाजार मंगळवारी भरतो.भाजीपाला, माळवे इतर संसार उपयोगी साहित्य लोक बाजारात खरेदी करतात. सण समारंभात लोक एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होऊन प्रत्येकाला सकारात्मक ऊर्जा देण्याचे काम येथील लोक करतात.अधिकारी व कर्मचाऱ्यांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे .
अधिकारी व कर्मचारी यांचे गाव
येथील अनेक तरुण महाराष्ट्र लोकसेवा स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होऊन अधिकारी झाले आहेत. तर अनेक तरुण सरळ सेवेची परीक्षा देऊन कर्मचारी म्हणून भरती झाले आहेत.
यामध्ये सहाय्यकआयुक्त, मुंबई. महानगरपालिका १. व सहाय्यक आयुक्त नवी मुंबई महानगरपालिका. १ उपसंचालक आरोग्य मंत्रालय मुंबई. १पोलीस निरीक्षक सीबीआय पुणे .१ पोलीस उपनिरीक्षक .मुंबई २. मंत्रालय कक्षअधिकारी २ .आयटी इंजिनियर २. बँक शाखाअधिकारी १. पोलीस कर्मचारी १५. महसूल कर्मचारी १. सार्वजनिक बांधकाम विभाग १. वनरक्षक २. सैन्यदल २०. शिक्षक १४. आरोग्य सेवक २. होमगार्ड २. खाजगी ड्रायव्हर१२५ इत्यादी अधिकारी कर्मचारी गावच्या सामाजिक व शैक्षणिक कार्यास मोठे योगदान देतात त्यांची प्रेरणा घेऊन अनेक तरुण स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत व शासकीय सेवेत जाण्यासाठी प्रयत्नवादी आहेत. *
सकारात्मक ऊर्जेची व ज्ञानाची खाण, संस्कृतीचा मान, विचाराची आण, श्रधेच ध्यान, लोकभावनेचा प्राण, अस आमचं खैराव! आमची आण, बाण, शान!!
माझे सुंदर, टुमदार खैराव गाव सांगली जिल्हामध्ये प्रसिद्ध आहे.
धन्यवाद!
ऋणनिर्देश आणि संकलन
श्री. भारत सखाराम क्षिरसागर
(सहायक शिक्षक)
यांच्या सौजन्याने.....!
#####################################
इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
या ब्लॉगच्या होम पेज वरील कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शन ला जा आणि इतर ब्लॉग वाचा .आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना whatsapp, facebook द्वारे शेअर करा .
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
#####################################
No comments:
Post a Comment